नंदूरबार आणि अहमदनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. दोन्ही गटाकडून प्रचंड दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
नगरमध्ये किरकोळ वादातून राडा
अहमदनगरमध्ये किरकोळ वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. काल रात्री हा प्रकार घडला. छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगर येथे ही घटना घडली. या दगडफेकीत चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमी तरुणांव नगर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दगडफेकीत दोन मोटरसायकलसह एका स्विफ्ट कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी 30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 10 ते 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
नगरच्या छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील गजराज नगरमध्ये दोन गटात राडा झाल्याची घटना ताजी असतानाच मुकुंद नगर परिसरात देखील दगडफेक झाली. त्यामुळे शहरातील या संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातील वातावरण सध्या निवळलं आहे. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलीसा कडून सांगण्यात आले आहे
सोशल मीडियावर वॉच
नंदूरबारमधील दोन गटातील हाणामारी प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 ते 16 जणांना ताब्यात घेतलं. या सर्वांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सायबर सेल सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही अफवा पसरू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. मात्र, सध्या नंदूरबारमधील तणाव निवळला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

