कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ श्री.वि.वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस तसेच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज सर्वधर्मसमभाव साहित्य व सांस्कृतिक मंच आणि लोकशाही विचारधारा साहित्य मंच चे आँनलाईन प्रथम कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्राप्रती अभिमान दर्शविणाऱ्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताने झाली. हे गीत समूह प्रशासिका कवयित्री वैशाली सुर्यवंशी यांनी त्यांच्या मधूर आवाजात सादर केले. सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, निर्माता दिग्दर्शक, लावणीकार तसेच समूह संस्थापकिय अध्यक्ष मा.देविदास गायकवाड यांनी त्यांच्या भाषणात, मराठी भाषेला योग्य न्याय मिळून जागतिक दर्जा मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले आदरणीय श्री.रविंद्र गिमोणकर सर यांनी समूहाचे आणि विविध उपक्रमांचे खूप कौतुक करून त्यांची सुंदर रचना सादर करून प्रशंसा मिळवली.
आदरणीय कवी शब्दस्वरा मंगरूळकर यांनी समूहाला मार्गदर्शन करून त्यांची अप्रतिम रचना सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कवी जयद्रथ आखाडे यांनी सुद्धा उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करून समूहाच्या उपक्रमाचे खूप कौतुक केले तसेच त्यांची अप्रतिम रचना यावेळी सादर केली. प्रमुख पाहुणे कवी डॉ.मधूकर दिवेकर यांनी सुद्धा समूहाचे कौतुक करून अप्रतिम काव्य सादरीकरण केले. कवीवर्य कुसुमाग्रज यांचे साहित्य हे सामाजिक भान जपणारे आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो तेव्हा आपल्या लेखणीतून समाजाच्या हितासाठी आवश्यक असलेले लिखाण झाले पाहिजे असे मत आपल्या प्रास्ताविकात समूह संस्थापिका कवयित्री, लेखिका सौ.सुनिता तागवान यांनी व्यक्त केले.
या कवी संमेलनात सुप्रसिद्ध गीतकार मा.देविदास गायकवाड यांनी “इश्काची भावना पेटली ” ही ठसकेदार लावणी त्यांच्या सुमधूर आवाजात सादर करून प्रचंड टाळ्या मिळवल्या. मा.कवी सुभाष शहा यांनी मराठी भाषेचे गुणगाण करणारी “मनी शब्दांनी ठुमकलेली ज्ञानेश्वर महाराजांची माऊली ” ही अप्रतिम रचना सादर केली. मा.कवी रत्नाकर सुखदेवे यांनी ‘माय मराठी’ ही कविता “माझी मराठी दुधावरची साय मराठी” ही कविता अतिशय सुंदर पद्धतीने तालासुरात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. धम्मोदय वाघमारे यांनी त्यांची “कसा होता तो काळ” ही ह्रद्यस्पर्शी कविता सादर करून सर्वांची दाद मिळवली. कवयित्री नूतन पाटील, सुनिता आकनुरवार यांनीही त्यांच्या रचना सादर करून मराठी भाषेचा गुणगौरव केला. ,माधुरी खेर्डेकर यांनी “याला जीवन ऐसे नाव” ही कविता सुंदर शैलीत सादर केली. सुजाता उके यांनी “माझी मराठी” ही भावस्पर्शी कविता सादर केली.
कवयित्री वैशाली सुर्यवंशी,अनिसा तडवी, प्राची वैद्य, सुनिता तागवान यांनी त्यांच्या सुंदर सुंदर रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कवी वाल्मिक सोनवणे, धम्मोदय वाघमारे, प्रा.पांडुरंग मुंजाळ, निवृत्ती पाटील,या सर्वांनी अतिशय सुंदर कविता सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली. अतिशय हर्ष उल्हासात हे कवी संमेलन पार पडले. या कवीसंमेलनात मराठी भाषेचा गोडवा, गुणगौरव, कौतुक, वैभव, आदर, सन्मान सर्वांनी आपापल्या काव्यरचनांतून व्यक्त केली. यावेळी एकापेक्षा एक सरस कवितांची,अभंगाची आणि लावण्यांची मेजवानी उपस्थितांना मिळाली. या कवी संमेलनाचे सुत्रसंचालन चारोळ्यांचा साज चढवून अतिशय बहारदार पद्धतीने कवयित्री व समूह प्रशासिका वैशाली सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन समूह प्रशासक कवी संदीप आंबोरकर यांनी केले तसेच प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन कवयित्री सुनिता तागवान यांनी केले.
