महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालत आहे. दरम्यान सध्या पुढचे दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज (दि. 30) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हे नक्की वाचा : पंजाबराव डख यांचे मान्सून संदर्भात मोठे भाकीत; या दिवशी होणार मान्सून महाराष्ट्रात दाखल.! पहा आणखी काय म्हटले
23 एप्रिलपासून विदर्भात वादळी वारे, जोरदार पाऊस तसेच गारपीट होत असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता तो कायम आहे. सतत होत असलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील तापमान काही अंशी कमी झाले आहे. राज्यातील तापमान 38 अंशांपर्यंत असल्याने उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत.

दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर तर मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आज (दि. 30) विदर्भातील वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा कायम आहे.
