महालोकवाणी न्यूज:-
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली. आज दिनांक २३/१/२०२३ दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढं राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढं जाऊ. शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण, प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोघांच्या संयुक्त निवेदनात:- आपल्या देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडं जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं सुरू आहे. हुकूमशाहीकडं सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षानं जाणवत आहे ,
प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळं निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडं सुरु आहे. इथली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
