महालोकवाणी न्यूज:-
सोलापूर, 4 मार्च : सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांच्या आक्रोशाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सामोरे जावे लागले. सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. भैया देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते निवदेन देण्यासाठी आले असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला.

जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असता पोलिसांनी रोखले. यावेळी विखे पाटील यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. भैया देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला काय गोळ्या घालणार का? असा संतप्त सवाल भैय्या देशमुख यांनी उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांनी भैय्या देशमुख यांना ताब्यात घेतले.
