टीम इंडियाने सीरीज जिंकून 2023 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर T20 सीरीजमध्ये 2-1 असा मालिका विजय मिळवला. सीरीजचा तिसरा सामना शनिवारी झाला. या निर्णायक मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर 91 धावांनी विजय मिळवला. या मालिका विजयाचे स्टार कोण आहेत? ते जाणून घ्या.

स्पीडगन उमरान मलिकने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सीरीजमध्ये उमरान मलिकने आपल्या भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. या सीरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. तीन मॅचमध्ये त्याने सात विकेट काढल्या. त्याच्या गोलंदाजीची इकॉनमी 9.63 होती. उमरान मलिकने या सीरीजमध्ये काही बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. हे विकेट ज्या पद्धतीने काढले, त्याला तोड नव्हती.

या सीरीजमध्ये सूर्यकुमार यादवने सध्याच्या घडीचा T20 क्रिकेटमधील तो सर्वोत्तम फलंदाज असल्याचं दाखवून दिलं. त्याने तिसऱ्या सामन्यात सेंच्युरी तर दुसऱ्या मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकवली. तो सीरीजमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन मॅचमध्ये 170 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 85 आणि स्ट्राइक रेट 175.25 चा होता.
कॅप्टन हार्दिक पंड्याने या सीरीजमध्ये शानदार कॅप्टनशिप केली. टीमला विजय मिळवून देण्यात त्याचे काही निर्णय महत्त्वपूर्ण ठरले. उदहारणार्थ पहिल्या सामन्यात अक्षर पटेलच्या हाती शेवटची ओव्हर देण्याचा धाडसी निर्णय. हार्दिकने या सीरीजमध्ये दोन विकेट काढले आणि 45 धावा केल्या. या सीरीजमध्ये त्याने प्रभावी कॅप्टनशिप केली.
