लोकसभा loksabha निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यास अद्याप अवधी असतानाही कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह पाहता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल आजच लागला असून दक्षिेणेचा गड नीलेश लंके हेच सर करतील असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोहटादेवी गड येथे करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.खा.संजय राऊत पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी फोनवरून उपस्थितांना संबोधित केले.

आ.पाटील म्हणाले,जनसामान्यांनी खांद्यावर घेतलेले नीलेश लंके यांच्यासारख्या नेतृत्वाला कोणीही थोपवू शकत नाही. सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हे नेतृत्व असून सेवा करण्याचा त्यांचा पिंड आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श लंके यांनी घालून दिला आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली रूग्णांची सेवा देशालाच नव्हे तर जगालाही भावल्याचे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
या मतदारसंघातील अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, महिला, व्यापारी, विविध जाती धर्माच्या आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी नीलेश लंके दिल्लीत आवाज उठवतील. जो आवाज मागच्या पाच वर्षात उठला नाही. त्यामुळे लंके यांच्या पाठीशी सर्वसामान्य माणूस उभा असल्याचे पाटील म्हणाले. आ.लंके म्हणाले की,आज मोहटादेवीचे दर्शन घेऊन आपण या यात्रेस सुरूवात केली असून आता ही स्वारी दिल्लीत पोहचल्याशिवाय थांबणार नाही. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून आपला विजय निश्चित आहे.
किमान दोन लाखांच्या मताधिक्याने आपण विजयी होणार असल्याचा विश्वास आ.लंके यांनी व्यक्त केला. निवडणूक आल्यामुळे पाच वर्षानंतर जनतेपुढे जाऊन विरोधकांवर साखर, डाळ वाटण्याची वेळ आली.आपण आव्हान उभे केल्यामुळेच त्यांना हे करावे लागल्यामुळे त्याचे श्रेय मलाच असल्याचे लंके यांनी सांगितले.
यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, आ. लहू कानडे, पक्ष निरक्षक अंकुश काकडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव प्रताप ढाकणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, किरण काळे, संदेश कार्ले, रफिक शेख, शिवशंकर राजळे, हरिष भारदे, मा. आ. साहेबराव दरेकर, वजीर पठाण, बंडू बोरुडे, अभिषेक कळमकर, योगिता राजळे, बाळासाहेब हराळ, सीताराम बोरुडे, गहिनीनाथ शिरसाठ, राहुल मगरे, बाळासाहेब डाके, अर्जुन घायताकड,राजेंद्र दौंड, संपत मगर, किसन आव्हाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आचार विचार महत्वाचे
विकास कामांच्या नावाखाली भाजपासोबत गेलेल्या अजित पवार व इतर नेत्यांचाही पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. विकास कामांच्या नावाखाली लाचारी पत्करणे योग्य नाही. विकासासाठी गेलात परंतू कोणत्या विचारसरणीसोबत आपण काम करतो आहोत. याला महत्व आहे. राजकारणात आचार, विचार महत्वाचे असल्याचे सांगताना शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे. महाविकास आघाडीच महाराष्ट्राला नेतृत्व देऊ शकेल असा विश्वास जनतेमध्ये असल्याचे पाटील म्हणाले.आमच्यातून गेलेल्या सरदारांना दिल्ली दरबारात सहाव्या रांगेत उभे रहावे लागत असल्याचा उपरोधिक टोला पाटील यांनी लगावला.
