सांगली : राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Union Social Justice Minister Ramdas Athawale) यांनी लगावला आहे. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस कोसळणार नाही. उलट 2024 पर्यंत स्थिर राहील, आणि पुन्हा सत्तेमध्ये देखील येईल, असा विश्वास देखील मंत्री आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार, असे संजय राऊत बोलत आहेत. मात्र आमच्या सरकारकडे 164 चे बहुमत असून सरकार पडण्याची भीती नाही. त्यामुळे 2024 पर्यंत कार्यकाळ पूर्ण करतील, त्यानंतर पुन्हा सत्ता येईल. त्याचबरोबर राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार झाला पाहिजे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाला मंत्री पद मिळावे तसेच महामंडळ पदी वर्णी लागावी, अशी मागणी केली आहे.
नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !
▶ पंतप्रधान पदाचे स्वप्न :
राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर बोलताना मंत्री आठवले म्हणाले, राहुल गांधीची यात्रा भारत जोडण्यासाठी नसून भारत तोडण्यासाठी आहे. आतापर्यंत काँग्रेसचे सरकार होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे भारत कोणाला तोडता येणार नाही. राहुल गांधी यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस जोडावे, असा टोला लगावला. नरेंद्र मोदी असेपर्यंत काँग्रेसला पंतप्रधान पदापर्यंत पोहचणे शक्य नाही. त्यामुळे राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे स्वप्न बघता येणार नाही, पण त्यांनी बघावे, मात्र काही होणार नाही. विरोधाकांनी एकी केली तरी काही होणार नाही, असा टोलाही लगवला आहे. राज्यात ठाकरे गट शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीवर बोलताना मंत्री आठवले म्हणाले, उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले म्हणजे शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आले असे म्हणता येणार नाही. भीमशक्ती माझ्यासोबत आहे. त्यांच्यासोबत केवळ वंचित आहे, ते एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही.
▶ आरपीआयचे अधिवेशन :
तसेच छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्त 5 आणि 6 तारखेला कोल्हापूरला आरपीआयचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 6 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी पक्षाचे वेगळे नाव वापरू नये. आरपीआय हे नाव वापरावे. वेगळे नाव वापरले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर राज्यातला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोबत आरपीआय आघाडीत असेल आणि योग्य त्या जागा आम्हाला मिळतील, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला 350 आणि एनडीएचे 450 खासदार निवडून येतील, असा विश्वासही आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला.
