महालोकवाणी न्यूज:
नगर – पंढरीची पहिली वारी महादेवांनी केली. धर्म शास्त्रात योग-याग, जप, अनुष्ठान असे देव प्राप्तीचे अनेक खडतर मार्ग आहेत. पण देव प्राप्तीचा सोपा मार्ग हा नामस्मरण आहे. महादेवांपासूनच वारकरी सांप्रदायाची सुरुवात झाली आहे, असे निरुपण हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांनी केले.
पाईपलाईन(Piplineroad) रोडवरील श्रीराम चौकात आयोध्यानगरीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरु असलेल्या सप्ताहात किर्तन सोहळ्यात हभप सिद्धनाथ मेटे महाराज यांचे किर्तन झाले. यावेळी भाविकांची गर्दी होती. किर्तनात हार्मोनियम वादक दत्तात्रय खांदवे, पखवाज वादक हभप ठाणगे महाराज, गोरक्षनाथ महाराज दुतारे व टाळकर्यांनी साथ दिली.
हभप मेटे महाराजांनी भगवान शिवशंकराच्या अनेक लिला आपल्या किर्तनातून सांगितल्या. महाशिवरात्रीचे महत्व सांगून महादेव हा भोळा आहे, पण त्यांच्या नामस्मरणाने कळी-काळालाही जिंकण्याची ताकद आहे. महादेवाचं मंदिर नाही, असे एकही गाव आपल्या देशात सापडणार नाही. पंढरपूरच्या विठूरायाप्रमाणेच हिंदू धर्मात देव-देवतांचे प्रत्येक गावात मंदिरे आहेत. यामुळे आपली संस्कृती टिकून राहते. पंढरपुरच्या वारीत माऊलींच्या सोहळ्याला मोठी परंपरा आहे. त्याप्रमाणे हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री उत्सवाला खूप मोठी परंपरा महत्व असल्याचे त्यांनी शिव महापुराणातील दाखले देत स्पष्ट केले.
महादेवांनी भास्मासुराला वर दिला व त्यानंतरही भस्मासुराची झालेली फजिती याबाबत त्यांनी सविस्तर वर्णन करुन किर्तन सोहळ्यात रंग भरला होता. महादेव प्रतिष्ठानचे शंतनू पांडव, शिवाजी लगड, दिनेश कुलकर्णी, दिनकर थोरात आदिंनी सप्ताहातील हरिपाठ, किर्तनाचे योग्य नियोजन केले. याबद्दल भाविकांनी सर्वांना धन्यवाद दिले.
