महालोकवाणी न्यूज:-
नगर – आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करुनच अभ्यास केला पाहिजे. घरातून आईने केलेले संस्कार, शाळेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी जे ज्ञान दिले आहे ते विद्यार्थ्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन राधाबाई काळे महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य किसन पायमोडे यांनी केले.
पंचांनी स्वत:च्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का ?
वसंत टेकडी येथील श्रीनाथ विद्या मंदिरचे वार्षिक पारितोषिक व स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख अतिथी श्री.पायमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त निर्मलचंद्र थोरात होते. व्यासपीठावर संस्थेचे साई पाउलबुधे, विश्वस्त आर.ए.देशमुख, रामभाऊ बुचकुल, दादासाहेब भोईटे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सुचित्रा डावरे, प्राचार्य संदिप कांबळे, डॉ.निलेश जाधव, भरत बिडवे, तसेच मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, अंजली शिरसाठ, मीरा नराल आदि उपस्थित होते.
श्री.पायमोडे पुढे म्हणाले, स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचा सोहळा म्हणजे, त्यांच्यामधील कला-गुणांचे लोभस दर्शन पहायला मिळते. श्रीनाथ मधून असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात घडताना बघितले. स्व.डॉ.पाउलबुधे यांनी या ज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परिक्षा, क्रीडा, काव्यवाचन, शिष्यवृत्ती आदिंसाठी प्रोत्साहित केले जाते, त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी या ठिकाणी घडत आहेत.
निर्मलचंद्र थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळालाही महत्व देण्याचे आवाहन केले. खेळामुळे शरीर सुदृढ होते. आरोग्याच्या दृष्टीने मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे. श्रीनाथ विद्या मंदिर हे एका वर्गात भरणारी शाळा होती, आज नगरमध्ये नाही तर महाराष्ट्रात या शाळेने नावलौकिक मिळविला आहे. आपल्या कलेतून गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार सौरभ वाखुरे याने मिळविला तर श्वेता गवळी हिने खो-खो सारख्या खेळातून असंख्य सुवर्णपदके पटकावून सुवर्णकन्या म्हणून ती याच शाळेची विद्यार्थीनी अशी ओळख देशाला करुन दिली.
प्रास्तविकात मुख्याध्यापिका अनिता सिद्दम यांनी अहवाल वाचन केले. संस्थाचालक, शिक्षक यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, प्रयत्नवाद, जिद्द निर्माण होते. भारताचे भावी आधारस्तंभ, सुजाण नागरिक घडविण्यासाठी शिक्षक सदैव प्रयत्नशील असल्याने शाळेचा नावलौकिक वाढत आहे, असे सांगितले.
यावेळी विविध स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.एन.यन्नम यांनी केले तर आभार तुळशीदास लबडे यांनी मानले.
