महालोकवाणी न्यूज
राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अशातच घटनातज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले की ”चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेनेसंदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही”

दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक आणि प्रभारींच्या नेमणुकाही केलेल्या आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांच्या विधानामुळे नक्कीच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

”कारण आताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल. त्यामुळे मग या निवडणुकांना काहीच अर्थ उरत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकींचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निकाल देऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यावरही सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जर १६ आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परिणाम होईल, त्यामुळे आयोगाने निर्णयाची घाई करु नये, असेही सरोदे म्हणाले
