महालोकवाणी न्यूज दि. १०/०२ /२०२३
अहमदनगर: अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा असावा, त्यासाठी तो सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे, असे मत शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांनी मांडले. येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील अर्थशास्त्र विभागाने केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे साहेब होते.
बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या कमी करणे, मनरेगा योजनेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात वाढीव खर्चाची तरतूद करणे हा अर्थसंकल्पाचा उद्देश असावा. हा अर्थसंकल्प वरून उत्तम वाटतो, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर योग्य प्रकारे जनतेपर्यंत जाणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धीमतेला येणाऱ्या काळात उत्तम संधी आहे. सरकारने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. लोकशाहीत तरुणांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. तरुणांची मते गृहीत धरली पाहिजेत. तरुणांनी आपल्या समस्यांबाबत सरकारला जाब विचारला पाहिजे, तसेच अर्थसंकल्पाचे योग्य विश्लेषण केले पाहिजे. सरकारने वित्तीय शिस्त बाळगली पाहिजे, असेही ते म्हणाले.
हे पण वाचा ; तुर्कीस्तान आणि सीरियामध्ये वारंवार भूकंप का होतात ? वाचा सविस्तर माहिती..
डॉ. सुवर्णा सूर्यवंशी यांनी महिला संवेदनशील अर्थसंकल्प आहे का? यावर मत व्यक्त केले. करोनाच्या काळानंतर स्त्रियांचा श्रम सहभाग कमी झाला आहे, महिला शिक्षणाला गळती लागली आहे. ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ असे धोरण असले तरी स्त्रियांचा सत्तेत आणि मालमत्तेत वाटा अत्यंत कमी आहे. महिलांना आर्थिक साक्षरतेची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. महिला समानता आहे का याचा अभ्यास झाला पाहिजे. कुटुंबाबरोबरच सर्वच क्षेत्रात आर्थिक निर्णय घेताना महिलांचा सहभाग वाढवला पाहिजे.
अर्थसंकल्पामध्ये महिला विकासाकडे विशेष लक्ष दिले गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्ष रा. ह. दरे साहेब म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने आपल्या उत्पन्नाचा विचार करून खर्चाचे नियोजन करणे व सर्वसामान्य जनतेने आपल्याकडे पैसे किती आहेत? हे पाहून खर्च करावा व शिल्लक कसे राहतील हे पाहावे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी केले. यावेळी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, डॉ. संजय कळमकर, डॉ. अनिल आठरे, प्रा. विक्रम लांडे, डॉ. माधव शिंदे, डॉ. भागवत परकाळ, डॉ. संदीप ईरुळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. बळीराम उंदरे व इतर विभागातील विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संतोष वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. प्रियंका खोसे यांनी मानले.
