अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पिकअपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडले असून, यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दाेन चिमुकले, दाेन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे.

नारायणगाव (ता. जुन्नर) येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे इथं जात असणाऱ्या शेतमजुरांना हा अपघात झाला आहे. अहमदनगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी इथं हा अपघात झाला आहे. अपघातातील सर्व शेतमजूर आहेत.
सुंदराबाई (वय २८ ), गौरव मधे (वय ५ ), नितीन मधे (वय २५ ) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. हे सर्व शेतमजूर पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. अर्चना मधे आणि सुहास मधे हे दोघे गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातात तीनही वाहनांना समाेरासमाेर धडक बसली. पिकअपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांकडून समजली.

पारनेर तालुक्यातून मजूर शेत मजुरीचे काम उरकून निघाले. दुचाकीवरून ते घरी जाताना रात्रीच्या सुमारास एका भरधाव पिकअपची या आठ जणांना जोरात धडक बसली. एकप्रकारने पिकअपने या दुचाकीवरील मजुरांना चिरडले. यात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
