१९४२ ला महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेक नेते अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैद झाल्याने आपण देशासाठी काहीतरी करावे हा विचार शहरातील रत्नम् पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्या मनात होता. त्यातून मग या तरुणांनी भूमिगत होऊन इंग्रजांचा संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार आंदोलन करण्याचे काम भिंगारसह अहमदनगरमध्ये सुरु केले.
एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधून बॉम्ब आणला. तो एका महिला क्रांतिकारकाने आपल्या पोटावर ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून भिंगारला आणला. त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली. ब्रिटीशांची गर्दी २५ डिसेंबरला संरोष टॉकीज येथे जास्त असते म्हणून ती जागा निवडण्यात आली. पिल्ले यांनी इशारा केल्यावर ताबडतोब हबीब खान यांनी बॉम्ब फेकला. यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले तर अनेकजण जखमी झाले. हबीबखान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ॲम्ब्युलन्समधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले. त्यामुळे कोणाला संशय आला नाही. त्यावेळेच्या मुंबई प्रांत म्हणजे गुजरात-महाराष्ट्र व मुंबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट होता. त्यानंतर पुणे व इतर ठिकाणी अशी मालिका सुरु झाली.
या घटनेची दखल कम्युनिस्ट फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती. त्यावेळी रेडिओवर “शाबास इंडिया” असे उदगार काढले होते. अहमदनगरचे स्वातंत्र्यसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुंबईहुन बोलावून ‘सरोश बाँब खटला’ हि केस चालविण्यास सांगितले. बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला. त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबून ठेवले. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर १९४७ साली त्यांची सुटका झाली.
आज देशांमध्ये हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन द्वेष पसरवण्याची काही पक्ष संघटना प्रयत्न करत आहेत. ज्यांचा या स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नव्हता. उलट हि लोकं त्यावेळी इंग्रजांसोबत काम करत होती. आपल्या देशबांधवांवर अन्याय अत्याचार करत होती. सरकारी नोकऱ्या करत होती. इंग्रजी सत्तेचा लाभ घेत होती. त्यांनी या घटनेपासून प्रेरणा घ्यायला हवी. आपल्या देशासाठी आपले हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन व इतर समाज एकत्र येऊन लढले. त्यामध्ये रत्नम पिल्ले, हबीबखान व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांसाठी प्रेरणादायी काम केलेले आहे. ते सर्वजण जाती, धर्मभेदविरहित राहून आपल्या प्रिय भारत देशासाठी खांद्याला खांदा लावून लढले. त्यांचा वसावारसा आपण येत्या पिढ्यांनी घेऊन आपला भारत देश जगात सर्वोत्तम कसा होईल, यासाठी सतत समाजपरिवर्तनाचे काम करत रहाणे काळाची आहे. त्या दिशेने आपण एकजूटीने जावू या.
- फिरोज़ चांद शेख.
अहमदनगर, महाराष्ट्र.
9273252888
