गेल्या 2 दिवसांपासून राजकीय वर्तुळातली चर्चा अजित पवारांच्या (Ajit pawar) अवतीभवती फिरतेय. सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आलाय आणि त्याचपार्श्वभूमीवर अजित पवार भाजपसोबत जाणार का? अशा चर्चा आणि दावे सुरु झाले. पण खरंच असं काही होण्याची शक्यता आहे का? याबाबत विचार करणं महत्त्वाचं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आमदार अपात्र होणार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार, असा दावा केला. त्यानंतर पुन्हा केंद्रस्थानी अजित पवार आले आहेत. हाच प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही पत्रकारांनी विचारला, पण पवारांनी न बोलणंच पसंत केलं. सत्तासंघर्षाच्या निकाल कधीही येऊ शकतो. ती तारीखही जवळ येतेय आणि त्यामुळं शक्यता आणि चर्चेला ऊत आलाय. समजा सुप्रीम कोर्टाच्या निकालानं शिंदेंचं सरकार कोसळलंच तर अजित पवार पुन्हा भाजपचं सरकार आणू शकतात का? पण खरंच अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात का? आणि समजा अजित पवारांनी जायचं ठरवलं तरी ते त्यांच्यासाठी शक्य आहे का? हाही मुद्दा आहे.

अजित पवारांनी भाजपला पाठींबा द्यायचं ठरवलंच. तर त्यांच्यासोबत तेवढे आमदार असणं आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 53 आमदार आहेत आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी 2 तृतीयांश आमदार फूटणं आवश्यक आहे. 53 आमदारांची 2 तृतीयांश संख्या म्हणजे 36 आमदार होतात. त्यामुळं अजित पवारांना 36 आमदारांना सोबत घ्यावं लागेल. एकट्या अजित पवारांनी भाजप सोबत येऊन काहीही होणार नाही.
अजित पवारांकडे गटनेते पद नाही
2019च्या निकालानंतर अजित पवार फडणवीसांसोबत गेले, त्यावेळी ते स्वत: गटनेते होते. त्यांनी गटनेते या नात्यानं समर्थनाचं पत्र राज्यपालांना दिलं होतं. आता विधिमंडळाचे गटनेते हे अजित पवार नाही तर जयंत पाटील आहेत. त्यामुळे आमदार फोडणं अजित पवारांसाठी प्रचंड कठीण आहे.
असं असलं तरी तिसऱ्या शक्यतेवरुन चर्चा रंगलीय. जर सत्तासंघर्षाच्या निकालानंतर सरकार पडलं तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन पुन्हा भाजप सत्तेत येऊ शकते. म्हणजेच ज्या प्रमाणं भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं त्याच प्रमाणं अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जाऊ शकते. पण त्यासाठी अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 36 आमदारांची साथ लागेल, असं झालं तर भाजपच्या मदतीनं अजित मुख्यमंत्री होतील आणि भाजप पुन्हा सत्तेत येईल.
