पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधी यांचं नाव घेत चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून घेऊन येतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुणे कसबा पोटनिवडणूक पार्श्वभूमीवरील मेळाव्यात ते बोलत होते.
रविंद्र धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी घेऊन येतील. त्यावेळी म्हटलं पाहिजे, “ओ धंगेकर आता तुम्ही महात्मा गांधींना घेऊन आलात ते आम्हाला वर्षभर नाही पुरणार”, असं चंद्रकांत पाटील यांना म्हटलं. हेमंत रासने यांना काहीही करून विजयी करायचं आहे.कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे जिंकायचीच आहे, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटलांना काँग्रेसच उत्तर
चंद्रकांत पाटलांच्या टिकेला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं की, महात्मा गांधींची भिती त्यांना (भाजप) आधीपासून आहेच, ती आजही कायम आहे. याचाच अर्थ आहे की गांधींच्या मुल्याने पुढे चालणारी काँग्रेस यांच्या हुकूमशाहीला आडवी येत आहे आणि संविधान पुढे जात आहे.काँग्रेस कधीही तब्येत ठिक नसलेल्या नेत्याला प्रचारात उतरवणार नाही. एकवेळ काँग्रेस निवडणूक सोडून देईल. यांनी जे गिरीश बापट, लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांच्यासोबत केलं तसं काँग्रेस कधीही करणार नाही.
एकवेळ निवडणूक गेली तरी चालेल पण आपल्या माणसाचा जीव वाचला पाहिजे हे जास्त महत्व काँग्रेससाठी राहिल, असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं.
